
“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” अभियान यशस्वी करण्यासाठी झोकून काम करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
छत्रपती संभाजीनगर विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, दि. 9 एप्रिल : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे राज्याच्या ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे अभियान असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. लोकसहभागातून आरोग्याचा जागर घडवून या अभियानाचे चळवळीत रुपांतर करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर येथील एम.आय.टी. इंजिनीअरिंग कॉलेजच्या मंथन सभागृहात आयोजित विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते ते बोलत होते. या कार्यशाळेत तेरा जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार प्रदीप जैसवाल, आमदार प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, एमआयटीचे संचालक मनीष शर्मा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व परिमंडळातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी तसेच सरपंच,पंचायत समिती सभापती व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे केवळ अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी एक व्यापक आरोग्य चळवळ आहे. या अभियानामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा घरपोच उपलब्ध होणार आहेत. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे हे या अभियानाचे वैशिष्ट्य असून, प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारल्यास आजारांचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी गावागावांत जनजागृती करणे आणि तपासण्यांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, राज्यातील एकही नागरिक सरकारी आरोग्य योजनांपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आता प्राथमिक आरोग्य केंद्रांसह सर्व रुग्णालयांमध्ये लागू करण्यात आली असून या योजनेची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत ईसीजी, डायलिसिस, स्टेमी प्रकल्प यांसारख्या अनेक सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गाव स्तरावरील सर्व समित्या अस्तित्वात येण्यासाठी शासन आदेश लवकरच निघणार असून, या आदेशान्वये गाव स्तरावरील त्याचप्रमाणे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा आरोग्य समित्यांची स्थापना करण्यात येईल आणि या सर्व समित्या लवकरच कार्यान्वित होतील. त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक असून त्यासाठी प्रभावी जनप्रबोधन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“प्रत्येक गावामध्ये एकाही व्यक्तीची आरोग्य तपासणी सुटू नये, यासाठी आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांनी घरभेटी वाढवाव्यात. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर वेळीच तपासणीद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते,” असेही त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील निधीअभावी प्रलंबित रुग्णालयांची सर्व कामे लवकर पूर्ण करण्यात येतील आणि लोकांच्या सेवेत ती रुग्णालये लवकरच येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव” हे अभियान ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, हे अभियान आपले स्वतःचे आहे अशा भावनेने प्रत्येकाने काम केले तर हे अभियान निश्चितच यशस्वी होईल. सरकारी रुग्णालयांची परिस्थिती आता बदलत असून खासगी रुग्णालयाला लाजवेल अशा प्रकारच्या सुविधा आता सरकारी रुग्णालयात उपलब्ध होत आहेत. आपण सर्वांनी मिळून एकजुटीने काम केले तर आरोग्य क्षेत्रात चांगले काम होईल. आजची ही कार्यशाळा संवाद साधण्यासाठी आहे. त्यामुळे गावांमधून आलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या काही सूचना असल्यास निश्चित मांडाव्यात आणि आरोग्य विभागाचा नावलौकिक वाढेल अशी कामगिरी करावी.
Full News on FB




MR



















