श्रीराम शिंदे | Shriram Shinde retweetledi

काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे.
आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !
MR

















